बुधवार, २९ मे, २०१३

सती प्रथा बंद करण्यासाठी पुण्याच्या शास्त्रींच्या बैठकीत इंग्रज अधिका-याचे पत्र !!


. टि. भा. ले. २२.
सेप्टेबर १८१९.
!! श्री !!
वेदशास्त्रसंपन्न समस्तशास्त्री याचे मजलसीतक्याप्टन  हेनरी इडास रॉबर्टसन साहेब बहादुर म्याजिस्ट्रेट सुभा पुणे याचे बोलणे कि
जी सती भाद्रपद वद्य शनीवारी गेली, त्या सतीचे  हाल झाले ते हाल ह्या मजलसीत जितके आहेत त्यानी पाहीले असते तरी त्याचे मनात येते कि, असे पुन्हा कोणासही होऊ नये येविषयी आम्हास मदत करते  त्यास हल्ली आमचे दिलात येते कि, सती जावयाचा दस्तुर फार खराब, आणि तुमचे शास्त्रात असे लिहिले नाही, गेल्यास चिता नाही, इतकेच मात्र आहे. ऐसियास ही गोष्ट पुन्हा होऊ नये यास्तव शास्त्रात जी रीत लिहिली आहे, कि सती मुकरर जावी असेही नाही त्या रीतीने जावे.
हल्ली शास्त्राची उलट रीत करुन जातात त्यास आम्ही गैर रीतीने जाऊ देणार नाही याजकरीता येविशी आम्ही सरकारात लिहुन बंदोबस्त करुं यात तुम्हास वाईट लागु नये तुमचे मनात येईल कि, सरकार मना करुं लागल्यास निरुपाय   त्यास  येविशी सरकार बंदोबस्त  करु लागल्यास त्यास का अवघड नाही?  परंतु सरकार मनात आणिते कि, ज्या जातीचा जो धर्म आहे, तो मना करण्याचे कारण नाही. परंतु सती जाते, तिचे असे हाल होतात हे काही चांगले नाही. हल्ली या मजलसीत वृद्ध आहेत, त्यांच्याही दिलात आले असेल कि, ऐसा दुर्लौकिक होतो, त्यापेक्षा बंद जाहल्यास बहुत चांगले, ऐसे आले असेल. ऐसियास या गोष्टिचा बंदोबस्त सरकारांतुन जाहल्यास आम्हास काही वाईट लागणार नाही


ऐसी सल्ला तुम्ही सगळ्यांनी दिल्यास  तुमची अब्रु सारे हिंदुस्तानात बहुत होईल, आणि ब्राम्हण धर्म वरकड सारे गोष्टिंत दयाधर्म आहे, आणि सती जाण्याविषयीच मात्र बहुत सक्ती आहे, ऐसे इतर जातीचे लोक याचे दिलात येते; आणि तुमचे शास्त्रात असे लिहिले नाही कि, सती गेली नाही तरी  तीची बेअब्रु आहे बेदस्तुर होते असेही नाही, हल्ली लोकातही सती गेली नाही तरी तिची अब्रु गेली असे कोणी बोलत नाही.
असे असता हल्ली बायको सती जाते याची सबब तीन प्रकारची आहे एक, त्या बायकोचा भ्रतार मृत्यु पावतो, तो वेळेस त्या स्त्रीस अत्यंत दुःख होऊन तीचा दिल बहुत कठीण होऊन ती जात्ये, दुसरी सबब कि, घरामध्ये स्त्रीचा भ्रतार नित्य म्हणत असतो कि, माझी मातुश्री सती गेली, तिचि बहुत अब्रु आणि लौकिक फार चांगला जाहला, असे म्हणत असतो तेणे करुन त्या स्त्रीच्या मनात येते कि, कदाचीत मी अशीच गेले   तरी माझाही  असाच अब्रु लौकिक फार होईल. असे चित्तात येऊन ती सती जाते तिसरी सबब कि, आपला पति मृत्यू पावला, आता आपणास काही आधार नाही, सती जावे तरी धैर्य नाही. परंतु चिंता नाही. माडव अथवा खोप करून वरती लाकडे बहुत घालतात. तो माडव तोडल्यानंतर राहावयाचा नाही, कदाचित मन फिरल्यास बाहेर निघू शकत नाही मग काही तरी होवो ऐशा तीन सबबीने  बायका आपला दिल सक्त करून जातात.
ऐसियास सती जातेवेळेस तिजला माडव करून त्याजवर फार लाकडे मोठमोठी  घालून, तो माडव तिच्या अगावर एकदा तोडून पाडावा, असे तुमचे कोणतेही शास्त्रात निघणार नाही शास्त्रात इतकेच कि, तृणाची पर्णकुटिका करून त्यात प्रवेश करावा असे असेल आणि कदाचित त्यातून बाहेर निघाली असता, त्यास थोडे प्रयश्चित्त पुन्हा शुद्ध करून जातीत घ्यावी असेही शास्त्रात आहे


हल्ली राधाबाई सती गेली, तिने आपले पतीचे लोभाने त्याजबरोबर सती जावे म्हणून निश्चयेकरुन सती गेली   ते वेळेस आपल्या हाताने आत जाऊन अग्नी लावून घेतला. तेव्हा अग्निज्वाळा अंगास लागू लागल्या ती आच सोसवेना, सबब बाहेर निघाली ते वेळेस तिने पुन्हा हिमत बाधून  पुन्हा त्या अग्नीजवळ आली, परंतु आत जाण्याची हिमत जाहली नाही असे समजून त्या बाईचे दीर जवळ होते, त्यांनी तिला जबरदस्तीने पुनः आत टाकली त्यास तुमचे शास्त्रात असे काही लिहिले नाही कि, सती बाहेर निघाली तरी पुन्हा जबरदस्तीने टाकावी. असे नसता ते केले हे शास्त्राच्या उलट होते.

याजकरिता आमच्या दिलात असे मुकरर येते कि, हा दस्तूर बहुत खराब आहे. तेव्हा अशी गोष्ठ पुन्हा होऊ, आम्हास मंजूर आहे कि  अशी खराब चाल पुन्हा होऊ देऊ नये  यास्तव पुन्हा आम्ही असे होऊ देणार नाही राधाबाईस तिचे दिराने अग्नीत   लोटल्यावर पुन्हाही निघाली. ते वेळेस तिचे हाल असे झाले कि, तिचे अंगाची कातडी जळून, मासाचे गोळे बाहेर निघुन पायातूनही रक्त चालले. हे तुमचे पाहिल्यात आले असते, तरी तुमचेही दिलात येते कि, ब्राह्यणाचा दयाधर्म आहे, त्याचा हा फार उलटा प्रकार होतो.
असे समजून तेच वेळेस तुम्ही सर्वत्रांनी म्हटले असते कि, हे झाले असे कदापि होऊ नये आता हल्ली जे मजलसीत बसले आहेत, त्यांनी तिचे हाल पाहून ऐकून दिलात आणीत असतील कि, जर करिता आपलिया बायको, तिची माया आपल्यावर जरी बहुत आहे, तत्रापि मुलालेकराची आई ती, असे हाल करून घेऊन सती जावयाची हिमत तिला होईल असे क्षणभर देखील कोणाचे दिलात येणार नाही. राधाबाईस जळते वेळेस तिजला हिमत झाली, तशी हिमत या पाठीमागे कोणासही जाहली नसेल पुढेही कोणास होणार नाही. कारण कि, अर्धी जळाली असता पुन्हा अग्नीजवळ कापत कापत आली यास हल्ली या मजलसित कोण शक्स आहे कि इतकी हिमत करू शकेल?
साराश हाच कि, शास्त्रामध्ये सती मुकरर जावी असे निघणार नाही, सती जाऊन माघारी पुन्हा निघाली असता, तिजला जबरदस्तीने आत टाकून द्यावी अगर तोडून टाकावी असे नाही तुम्ही म्हणाल कि, शास्त्र नाही परंतु आचार बहुत दिवसी आहे, कि पुन्हा माघारी निघू देऊ नये त्यास आचार बहुत खराब आहे. कारण कि, तुमचे शास्त्रात दुसरे आचार किती सांगितले आहेत? ते आचार हल्ली सोडून देऊन मनस्वी अनाचार करितात, त्यास कोणी पाहात नाही त्याचा बंदोबस्त करावा याविषयी फिकीर कोणीही करीत नाही, सतीविषयी शास्त्रार्थ असता त्याप्रमाणे वहिवाट करीत नाही दुसरे, सती गेल्याने स्वर्गप्राप्ती आहेअसे शास्त्रात लिहिले आहे, असे तुम्ही म्हणाल, तरी निश्चयेकरून जी जाते आणि इमान शाबूत राखते ती स्वर्गास जाते पारान्तु अशी कोणी नाही कि, अग्निस्पर्श अंगास जाहलीयावर, तेच इमान शाबूत राहते असे नाही. अग्निस्पर्शीसमयी बुद्धीस भ्रंश होऊन, नंतर इहलोकही नाही परलोकही नाही असे होते ऐशियास कोणतेही माणसाचे दिलात नाही कि, आपले खुशीने अग्नीत ठरून जाळून घ्यावे. असे कदापि कोणतेही काळी घडणार नाही. कोणतेही दयावंत माणसास जळण्याचे दुःख खुद्दास अनुभव आल्याशिवाय विचार करू शकत नाही. ऐशियास तुमचे दिलात या गोष्ठीचा विचार काय आला असेल?

आम्हावर मेहेरबानी करून, तुम्ही सर्वांनी मिळून असा बंदोबस्त करावा कि, अशी गोष्ठ पुन्हा आमचे दृष्ठीस पडू नये त्या बायकोस पुन्हा ज्याने टाकिलीत्यास दया आहे असे कोणी बोलणार नाही, शास्त्रातही टाकावी असे नाही त्यास ज्या शक्साने के काम केले, त्यास मुकरर सजा व्हावी, आम्हास मंजूर आहे आहे कि त्यास सजा द्यावी शास्त्राकर्ते मोठमोठे होऊन गेले, त्यास बहुत दया  होती त्यांनी सर्व गोष्ठीचा विचार करून, त्यास असा बंदोबस्त केला असेल कि, सतीच्या मनात बाहेर निघावयाचे जाहल्यास तिला बाहेर निघण्याविषयी फुरसत असावी कारण कि, जिचे इमान शाबूत राहत नाही, तिने बाहेर निघावे हे चांगले. असे जाणून तृणाच्या पर्णकुटीकेचा कायदा त्यानी केला

 परंतु तुम्ही आता शास्त्राची आज्ञा उलट करून आपले मगरूरीने दया सोडून देऊन त्या सतीस त्यास तुमचे शास्त्रात असेही आहे कि, सती बाहेर निघाली असता तिला जो वाचवील त्यास बहुत पुण्य आहे हा शास्त्रार्थ तुम्हास माहित आहे काय? आम्हास ठाऊक नाही आम्हास मंजूर नाही कि, आम्ही तुम्हास समजवावे परंतु आम्हास मुनासब आहे कि, हा खराब दस्तूर मना केल्याने तुमचे शास्त्राचे उलट होत नाही तेव्हा आम्ही हि गोष्ठ होऊ देणार नाही. पण तुम्ही क्षमावंत आहा, आणि सा-याचे दिलातही  आहे कि हा दस्तूर बहुत खराब आहे, हा मोडावा. परंतु तुम्हास या गोष्ठीची शरम आहे याजकरीता तुम्ही आमची अर्जी ऐकून घेऊन, हा दस्तूर खराब आहे, हा मोडल्यास आम्हास वाईट लागणार नाही अशी खात्री करावी म्हणजे येविषयीचे बंदोबस्ताविषयी सरकारांत लिहून पाठवू. अशी खातरी तुम्ही केलीयास तुमची अब्रू, दया धर्माविषयी फार होईल परंतु सती कोणतेही -हेने जावी याविषयीची खातरी करनेही तुमचे मर्जीची गोष्ठ आहे आता इतके तुम्ही समजावे कि, आजपासून जी सती जाणार, तिने शास्त्राचा जो कायदा तृणाची पर्णकुटिका करून जावे असे आहे, त्याप्रमाणे जावे. ते होता शास्त्राच्या उलट होऊ लागल्यास आम्ही होऊ देणार नाही कदाचित शास्त्रमार्गाप्रमाणे एकादी सती गेली आणि पुन्हा अग्नीतून बाहेर निघाली, तर जो कोणी जबरदस्ती करून आत टाकील किवा तोडून टाकीलत्या शक्सास आम्ही खुनी असा जाणून त्याचे परिपत्य मुनासब आहे त्याप्रमाणे केले जाईल.